Uddhav Thackeray On Raj Thackeray Alliance : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच चर्चा रंगली आहे. ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार का? शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे युती होणार की नाही, यावर सध्या जोरदार खलबतं सुरू आहेत. विशेष म्हणजे, हे फक्त राजकीय चर्चेपुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर खुद्द उद्धव ठाकरे यांनीही यावर थेटपणे भूमिका घेतली आहे. नुकत्याच मातोश्रीवर झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी थेट विचारलं “मनसेसोबत युती केली, तर चालेल का?” आणि यावर शिवसैनिकांनी दिलेला प्रतिसाद देखील तितकाच स्पष्ट होता “हरकत नाही, तुम्ही पुढचं पाऊल उचला!”. Uddhav Thackeray On Raj Thackeray Alliance
ठाकरे बंधूंच्या जवळ येण्याचा प्रयत्न नातेवाईकांकडून (Relatives try to get closer to Thackeray brothers)
या युतीच्या चर्चेमागे नुसती राजकीय गरज नाही, तर व्यक्तिगत स्तरावरही पावलं उचलली जात आहेत. ठाकरे कुटुंबातील नातेवाईकांनीच राज आणि उद्धव यांच्यातील दरी मिटवण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. दोघांचाही ‘ठाकरे’ ब्रँड टिकवायचा प्रयत्न असताना, एकत्रित होणं ही काळाची गरज असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.
पदाधिकाऱ्यांनी युतीसाठी दाखवली सकारात्मकता (Officers showed positivity for the alliance)
उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या बैठकीत बहुतेक पदाधिकाऱ्यांनी मनसेसोबतच्या युतीस स्पष्ट पाठिंबा दर्शवला. “मनसेसोबत युती झाली तर चांगलेच आहे, तुम्ही वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू करा,” असा संदेश त्यांनी ठाकरेंना दिला. शिवसैनिकांचा सूर ऐकूनच युतीची शक्यता अधिकच मजबूत झाल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.
ठाकरे ब्रँड वाचवण्यासाठी एकत्र येणार का?(Will Thackeray come together to save the brand?)
राजकीय पटलावर आता एकच चर्चा आहे “ठाकरे ब्रँड वाचवायचाय, तर ठाकरे बंधूंना एकत्र यावंच लागेल!” 2025 मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही युती फक्त भावनिक नसून, राजकीय गणितांचाही भाग ठरू शकते. याच संकेतांनी भरलेली पोस्टर्स मुंबईच्या रस्त्यांवर झळकत आहेत “मराठी माणसाचं स्वप्न ठाकरे बंधू पुन्हा एकत्र” असा आशय असलेली भावनिक साद देणारी मोहीम सोशल मीडियावरही पाहायला मिळत आहे.
‘सामना’च्या मुखपृष्ठावर ऐतिहासिक फोटो
या सगळ्या घडामोडींना बळ देणारं एक मोठं पाऊल म्हणजे, 7 जूनच्या ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्राच्या पहिल्या पानावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्र फोटो छापण्यात आला. अनेक वर्षांनंतर हे दृश्य पाहायला मिळाल्यानं शिवसैनिक आणि मराठी जनतेत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या फोटोखाली उद्धव ठाकरेंचं वाक्यही ठळकपणे झळकलं “संदेश देणार नाही, बातमीच देतो… महाराष्ट्राच्या मनात जे आहे, तेच होणार!”
आदित्य ठाकरेंचा सूरही सकारात्मक?
या युतीवर बोलताना आदित्य ठाकरे यांनीही काहीसा उघड सूर दिला आहे. त्यांच्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्या पद्धतीनं ठाकरेंच्या गोटातून प्रतिक्रिया येत आहेत, त्यामुळेच राज-उद्धव पुन्हा एकत्र येणार हे आता फक्त कल्पना राहिलेली नाही, तर प्रत्यक्षात घडू शकणारं वास्तव ठरतंय.
आधी मुख्य तत्वे शोधून त्यावर एकमत होऊ द्या.